Friday, November 8, 2013

राशीभविष्य...!!!

राशीभविष्य... खरं तर ही संकल्पनाच मला कळत नाही अजुनही... मी ह्या बाबतीत अज्ञानी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.. इथे कोणासही दुखवायचा हेतु नाही पण जगातला प्रत्येक माणूस कुठल्या नं कुठल्या राशीमध्ये फिट होतो ते कसंकाय हेच कळत नाही मला...

ह्या राशीची माणसं अशी असतात त्या राशीची माणसं तशी असतात असं नेहमी ऐकण्यात येतं, पण ह्याचं गणित कसं मांडतात हे मला अजुनही कळलेलं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, १०० माणसं १२ राशींमध्ये विभागली तर साधारणपणे ८-९ माणसांचं भविष्य एक समान असतं असं म्हणायला हरकत नाही. पण तसं खरंच असतं का? अर्थात नाही... असं असतं तर या जगात कित्येक लता दिदी आणि कित्येक साचीन तेंडुलकर जन्मले असते.. हो की नाही...



आपण एखाद्या माणसाबद्दल कधीतरी म्हणतो की "आपल्या राशीलाच लागलाय" म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? जन्मपत्रिका बघून लग्न ठरले असेल तर आपण असं म्हणतो का कि "हे दोघे एकमेकांच्या राशीलाच पूजले आहेत" म्हणून.. नाही ना?
चंद्र-सूर्याच्या भ्रमणाचा प्रभाव माणसाच्या प्रकृतीवर होतो हे मान्य आहे पण हे ग्रह तारे आमचं भविष्य कसं ठरवू शकतात हे मात्र एक कोडंच आहे.

"माणसानं केलेल्या एखाद्या चुकीच्या कृतीमुळे त्याला भोगावे लागणारे त्रास हे ग्रह-ता-यांच्या भ्रमणावर कसे काय ठरू शकतात?" असा प्रश्न केला असता त्याच्या पत्रिकेत हा दोष आहे किंवा तो योग आहे असं समजतं आणि त्या दोषामुळेच त्याच्याकडून असे कृत्य घडले अशी उत्तरेही मिळतात. मग त्या ग्रहाची पूजा किंवा शांत करावी लागते जेणेकरून त्याचा त्रास होत नाही... हे असं कसं शक्य आहे? आपण पूजा केली किंवा शांत केली की तो ग्रह शांत होतो का? किंवा आपली भ्रमण कक्षा बदलतो का?

"शनीची साडेसाती" हे कधीही न उलगडलेलं आणि खरंतर कधिही न उलगडणारं एक कोडंच आहे. एखादा ग्रह वक्री आहे म्हणजे नक्की काय? नुकत्याच जन्मलेल्या बाळाची पत्रिका बनवली जाते आणि मोठा होऊन ते कोण बनणार हे सांगितलं जातं.. लाखातली एखादीच व्यक्ती तशी बनत असेल.. बिचारं बाळ रांगायलाही लागलेलं नसतं आणि त्याच्या नावानी त्याचे आई वडील कोणतीतरी पूजा करत असतात शनी किंवा राहू केतू ला खुश ठेवण्यासाठी...

एखाद्या व्यक्तीला मंगळ असतो म्हणजे नेमकं काय असतं? खरंतर "मंगल" म्हणजे शुभ... म्हणजे या अर्थाने मंगळ असणारी व्यक्ती खरंतर नशीबवानच म्हणायला हवी... आणि हा मंगळ जर अशुभ मानला जात असेल तर इस्रोनी याच मंगळावर यान पाठवताना एखादा शुभ-मुहूर्त काढला असेल का? मंगळ अशुभ का आहे हे जाणून घेणारी एखादी यंत्रणा या यानावर कार्यरत असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे...

२१व्या शतकात जिथे माणूस मंगळावर आणि चंद्रावर स्वारी करत आहे तिथेच तो शुभ आणि अशुभ ग्रहांची व्याख्या अजुनही देत आहे.. हे सगळं अजब आहे...नरेंद्र दाभोळकर कोणत्या राशीचे होते? का त्यांची अजून कोणती १३वी रास होती "so called साधुसंतां"च्या मागे लागणारी? ते काही असो पण त्यांचा कोणता तरी ग्रह नक्की वक्री असणार किंवा त्यांना शिनीची साडेसाती चालू असणार... खरंच असंच असेल का? असो...

शेवटी माणूस म्हणून आणि समाजप्रिय प्राणी म्हणून आपण इतर कोणाच्या राशीला न जाणे ह्यातच शहाणपण आहे...

-मंगेश केळकर
(८-नोव्हेंबर-२०१३)

Thursday, August 29, 2013

घसरण... मूल्याची की मूल्यांची...

कोण म्हणतंय रुपया पडतोय? सर्व अर्थशास्त्र पंडितांनी जरा नीट अभ्यास करायला हवा... त्यांना म्हणावं जरा इकडच्या दहीहंड्या बघा... जसजसे हंडीचे थर वाढतायत तसतसा रुपया पण वाढतोय... कुठे १० लाख, कुठे २० लाख, कुठे ३० लाख... आमच्याकडे तर पैसा पाण्यासारखा वाहतोय... आपल्याकडील सर्व राजकीय पक्ष आज एवढे सबळ आहेत की खरं तर डॉलरच पडू शकेल... संपत्तीचा पुरेपूर वापर कसा आणि कुठे करावा हे ह्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे... बघा नं, इथे खरंच कसा पूर आला आहे पैशाचा...



मला खरंच अभिमान वाटतो आपण किती समृध्द आहोत ह्याचा... सगळ्याच बाबतीत... पैसा तर आहेच पण सांस्कृतिक समृध्दता सुद्धा भरभरून वाहत आहे... आणि ते सुद्धा २१ व्या शतकात राहतो ह्याचा विसर न पडता... आपली संस्कृती पुढे मागे एवढी समृद्ध होईल असा विचार साक्षात भगवान श्रीकृष्णाने पण केला नसेल... आता हेच बघा ना, शीला की जवानी किंवा तेरा प्यार हुक्का बार यांसारखे सुप्रसिद्ध नृत्याविष्कार चालू असताना गोविंदा हंडी फोडतात... आपली संस्कृती आणि २१ व्या शतकातील सगळ्या मॉडर्न गोष्टी ह्यांचं खरंच एक अनोखं Fusion बघायला मिळतं...

फुले, आगरकर, रानडे असे हे सगळे आज जर आपल्यात असते तर त्यांना खरंच अभिमान वाटला असता आपल्या सगळ्यांचा... एवढे सगळे समाजसुधारक जन्माला आलेले बघून आणि त्यांनी केलेली आधुनिक समाजाची जडणघडण बघून त्यांना स्वत:चीच लाज वाटली असती... खरे महान कार्य तर आत्ताची नवीन पिढी करते आहे असंच त्यांचंही मत झालं असतं... एकत्र येऊन असे सामाजिक सोहळे साजरे करावे, अश्या सोहळ्यांमध्ये एखादा तमाशाचा फड किंवा मद्यविक्री केंद्र चालू करावे जेणेकरून अधिकाधिक जनसमुदाय जमा करता होईल आणि जनजागृती करणे अधिक सुलभ होईल ही खरंच किती चांगली कल्पना आहे असंच त्यांनाही वाटलं असतं...

परवा म्हणे दोन बालिकांवर जबरदस्ती केली गेली आणि ते पण भर वस्ती मध्ये, चारचौघांसमोर... पण अहो वस्त्रहरण द्रौपदीचा पण झालं होतच की १०० कौरवांसमोर आणि दरबारातील ऋषीमुनींसमोर... काही दिवसांपूर्वी नरेंन्द्र दाभोळकर नामक व्यक्तीवर हल्ला केला गेला आणि हत्या केली गेली... पण अहो ३३ कोटी देवांची भक्ती करणा-या कित्येक कोटी साधु-संतांच्या विरोधात गेल्यावर दुसरे अजुन काय होणार... अहो ते साधुसंत आपल्यासारख्या भोळ्याभाभड्या लोकांना साक्षात देव दर्शन घडवतात...

असो, माझं ही अशी मतं ऐकून माझी अर्धांगिनी मला म्हणाली "कोकणस्थ आहोतच पण तू आता झालास हो पक्का पुणेकर"... मला २ मिनिटं खरंच वाटलं आपण टोमणे वगैरे मारतोय की काय... पण मग मनाची समजूत काढली... माझ्या नाही बायकोच्या... :-) :-)

-मंगेश केळकर
(२९ ऑगस्ट २०१३)